भारत-पाक तणाव वाढतोय! एटीएम बंद होणार? सरकारनं दिले बँकांना कठोर आदेश; सायबर हल्ला टाळण्यासाठी कडक पावलं

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India Pakistan News : सध्या देशात एकंदरच वातावरण तापलं आहे. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. त्यातच सोशल मीडियावर काही फेक मेसेज व्हायरल होत आहेत की, पुढील काही दिवसांत देशभरातील एटीएम सेवा बंद होणार आहेत. या अफवांमुळे जनतेमध्ये गोंधळ आणि अस्वस्थता वाढली आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं गंभीर दखल घेतली असून बँकांना सखोल सूचना दिल्या आहेत. India Pakistan News

‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू, सरकार सज्ज

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ७ मेपासून भारत सरकारने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ हाती घेतलं आहे. हे ऑपरेशन सुरू झाल्यापासून भारत-पाकिस्तानदरम्यान सीमेवर कारवाया वाढल्या असून परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशात कायदा-सुव्यवस्था आणि वित्तीय सेवा अखंड ठेवण्यासाठी सरकारनं तयारी सुरू केली आहे.

बँकांना सरकारचे कठोर आदेश

भारतीय वित्तीय सेवा विभागाने (DFS) सर्व प्रमुख बँकांना एक पत्र पाठवून त्यांना त्यांच्या अंतर्गत व्यवस्था बळकट करण्यास सांगितलं आहे. विशेषतः सायबर सुरक्षेबाबत आणि ग्राहक सेवा अखंड ठेवण्याबाबत बँकांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये सीमावर्ती भागातील बँक शाखा आणि एटीएममध्ये पुरेसा रोख निधी असावा, यावर खास भर देण्यात आला आहे.

क्यूआरटी तयार – २४x७ लक्ष ठेवणारी टीम

कॅनरा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक के. सत्यनारायण राजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या बँकेने एक ‘जलद प्रतिसाद पथक’ (Quick Response Team – QRT) तयार केलं आहे. या टीममध्ये आयटी, ऑपरेशन्स आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे पथक २४ तास सतर्क राहून कोणताही सायबर हल्ला, रोखटंचाई, किंवा सेवा अडथळा यांच्यावर लक्ष ठेवत आहे. “आपत्कालीन स्थितीत ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही सतत सिस्टिमची तपासणी करत आहोत,” असं राजू यांनी सांगितलं.

युनियन बँकची सुद्धा सज्जता

युनियन बँक ऑफ इंडियाच्या सीईओ ए. मणिमेखलाई यांनी सांगितलं की, त्यांनीही एक सक्रिय बहुस्तरीय सायबर संरक्षण यंत्रणा उभी केली आहे. डिजिटल व्यवहारांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ते सायबर सुरक्षेवर सतत लक्ष ठेवत आहेत. DFS च्या सूचनेनुसार त्यांनीही एटीएम आणि शाखांमध्ये पुरेशी रोकड राखण्याचे आदेश दिले आहेत.

एटीएम बंद होणार नाहीत, अफवांपासून सावध!

सध्या सोशल मीडियावर ‘देशात युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यामुळे एटीएम बंद होतील’ अशा अफवा मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. मात्र सरकारकडून किंवा कोणत्याही बँकेकडून अशा प्रकारची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. उलट, बँकांना आदेश देण्यात आले आहेत की कोणत्याही परिस्थितीत एटीएम सेवा बंद होता कामा नये. त्यामुळे सामान्य जनतेने या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीचीच वाट पहावी.

सीमावर्ती भागात अधिक सतर्कता

राजू यांनी सांगितलं की, “आम्ही विशेषतः जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थानसारख्या सीमावर्ती भागातील एटीएममध्ये रोज दोनदा रोकड भरतोय. नागरिकांना काहीही अडचण होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत.” याशिवाय, कोणत्याही प्रकारच्या गोंधळाची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा रक्षकांची उपस्थिती देखील वाढवण्यात आली आहे.

सायबर सुरक्षेवर बँकांचा फोकस

जगभरात सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्याने आणि सध्या निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात काही सायबर गुन्हेगार आर्थिक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात, हे लक्षात घेऊन बँकांनी त्यांच्या सर्व प्रणालींची तपासणी सुरू केली आहे. फायरवॉल अपडेट करणं, डेटा बॅकअप घेणं, आणि एन्क्रिप्टेड व्यवहार प्रणाली वापरणं यावर भर दिला जात आहे.

सर्वच बँकांनी एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे – “कितीही तणावपूर्ण वातावरण असो, देशातील कोणत्याही भागातील ग्राहक सेवा थांबवली जाणार नाही. आर्थिक यंत्रणा सुरळीत चालू ठेवणं ही आमची जबाबदारी आहे.”

सरकारच्या बैठका रोज सुरू

वित्त मंत्रालय, गृह मंत्रालय, रिझर्व्ह बँक, DFS आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा यांच्यामध्ये रोज बैठका घेतल्या जात आहेत. प्रत्येक दिवसाचा आढावा घेतला जात असून, परिस्थितीनुसार धोरण ठरवली जात आहेत. सरकारकडूनही आश्वासन देण्यात आलं आहे की, बँकिंग सेवा सुरळीत चालू राहतील आणि सामान्य नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

सध्या भारत आणि पाकिस्तान तणाव वाढत असल्याने, सामान्य नागरिकांनी घाबरून न जाता योग्य खबरदारी घेऊन सावध राहावे! आणि आपल्या जवानांसाठी प्रार्थना करावी!

हे पण वाचा | महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही; सर्वांची बाहेर घालवायची व्यवस्था केली आहे – देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

Leave a Comment