Maharashtra Rain Update : सध्या सोशल मीडियावर ‘मान्सून आलाय’ असं सांगणारे फोटो-स्टेटस व्हायरल होत आहेत. पावसाच्या सरी पडतायत, विजांचा कडकडाट ऐकू येतोय, आकाश ढगांनी भरलंय… पण हा मान्सून नाही. मग हा पाऊस तरी काय आहे? याचं उत्तर हवामान विभाग आणि खासगी हवामान संस्थांनी दिलं आहे. हा आहे वादळी पाऊस, म्हणजेच मान्सून पूर्व हवामानातील असमान स्वरूपाचा पाऊस. Maharashtra Rain Update
एप्रिलअखेर भारताच्या बहुतांश भागांमध्ये तापमान विक्रमी स्तरावर (Heat increase) गेलं होतं. या उष्णतेमुळे वातावरणात बाष्प तयार होऊन कमी दाबाचा पट्टा तयार झाला. परिणामी, मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रासह दिल्ली, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या भागांमध्ये वादळी पावसानं झोडपलं. यामुळे अनेकांना तो मान्सून वाटू लागला. पण हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय की मान्सून अजून काही आठवडे दूर आहे.
पुढील २४ तास महत्त्वाचे, यलो अलर्ट जारी
महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मध्य भागांमध्ये पुढील २४ तासांत जोरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. याठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मात्र, नागपूर, अकोला, यवतमाळ सारख्या विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र ४० अंशांपर्यंत तापमान पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा अर्थ, पाऊस काही ठिकाणी, उकाडा काही ठिकाणी – अशी असमान स्थिती पाहायला मिळणार आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही पाऊस
कोकणातील ठाणे, पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्येही वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मागील दोन दिवसांत मुंबई आणि आसपासच्या परिसरात झालेल्या अवकाळी पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली होती. मात्र आता काहीशी उसंत मिळण्याची शक्यता आहे. आकाश पुन्हा निरभ्र होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
मान्सूनपूर्व स्थितीमध्ये बदल
खासगी संस्था स्कायमेटच्या अंदाजानुसार पुढील आठवड्यांपासून मान्सूनपूर्व हवामानात अधिक सातत्यपूर्ण बदल होणार आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून अंदमान समुद्रात चक्राकार वारे निर्माण झाले आहेत. हे घटक मान्सूनसाठी पूरक ठरणारे असले, तरी अद्याप मान्सून अधिकृतरीत्या दाखल झालेला नाही.
पावसाळा अजून सुरू झालेला नाही!
सोशल मीडियावर पावसाचे व्हिडीओ शेअर करताना “मान्सून आलाय” असं लिहिण्यापेक्षा “वादळी पाऊस” असं लिहिलंत, तर माहिती अधिक अचूक पोहोचेल. या हवामान बदलांमुळे विजेपासून संरक्षण, वाहन चालवताना काळजी, आणि शेतकऱ्यांनी पीक व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे.
हे पण वाचा | मान्सून महाराष्ट्रात कुठपर्यंत पोहोचला? हवामान विभागाने दिली नवीन मोठी अपडेट..