Weather Alert | राज्यातील हवामानाचा रंग पूर्णपणे बदलला असून, आता प्रत्यक्षात पावसाचे दिवस सुरु झाले आहेत. मागील 4-5 दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अनुभव येतोय आणि आता 15 जून रोजीही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा (IMD) इशारा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 23 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, काही ठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्टही(Red and Orange Alert) जारी करण्यात आलेत. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असली, तरी शहरात मात्र पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे यासारख्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. Weather Alert
मुंबईसह कोकणात पावसाचा जोर
मुंबई शहर व उपनगरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, कोकण किनारपट्टीत पावसाचा जोर अधिक जाणवणार आहे. रत्नागिरीला थेट रेड अलर्ट, तर पालघर, रायगड, ठाणे आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मुंबईसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केलाय.
पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाचा इशारा आहे. मात्र, पुणे शहर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांसाठी कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. घाट परिसरात सॅफ्टी अलर्ट पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
उत्तर महाराष्ट्रात सावधगिरी आवश्यक:
नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात तुरळक ठिकाणी पावसाचा जोर जाणवणार आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह हलकासा ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठवाड्यात पावसाचा गडगडाट:
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या आठही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी झाला आहे. या भागात 30 ते 40 किमी/ताशी वेगाने वारे वाहणार असून, त्यासोबत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
विदर्भात ११ जिल्ह्यांना अलर्ट:
विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहील. वीजेचा कडकडाट, गडगडाटासह वारे आणि पावसाची शक्यता आहे.
पाऊस म्हणजे संकट आणि संधी दोन्ही
शहरांमध्ये रस्त्यावर पाणी साचण्यासारख्या अडचणी निर्माण होत आहेत, वाहतूक विस्कळीत होतेय, परंतु दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी पावसाची हजेरी ही मोठी दिलासादायक गोष्ट आहे. अनेक भागांत खरीप हंगामाच्या पेरण्या सुरू झाल्या असून, जमिनीत ओल निर्माण झाल्याने शेतीच्या कामांना गती मिळाल्याचं पाहायला मिळतंय.