UPI new rules | UPI वापरणाऱ्या लाखो ग्राहकांसाठी आजपासून एक मोठा बदल लागू झाला आहे. फोनपे, गूगल पे, पेटीएमसारखी अॅप वापरून जर तुम्ही पैशांची देवाणघेवाण करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण, आजपासून UPI व्यवहारात स्टेटस आणि रिव्हर्सलसाठी लागणारा वेळ ३० सेकंदांवरून थेट १० सेकंदांवर आणण्यात आला आहे. म्हणजेच जर व्यवहार फसला, अडकला किंवा अर्धवट झाला, तर त्याची माहिती आता तुम्हाला तीनपट वेगाने मिळणार आहे.UPI new rules
NPCI म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यासंदर्भात एक सर्क्युलर जाहीर केलं असून, त्यात UPI व्यवहारांच्या API सेवा अधिक जलद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘चेकिंग ट्रान्झॅक्शन स्टेटस’ आणि ‘ट्रान्झॅक्शन रिव्हर्सल’ या महत्त्वाच्या सेवा आता अवघ्या १० सेकंदांत पूर्ण व्हाव्यात, असा बदल लागू झाला आहे. याशिवाय, ‘पैसे पाठवताना किंवा मागवताना’ वापरण्यात येणाऱ्या व्हॅलिडेशन सेवेसाठीची वेळ देखील १५ सेकंदांवरून १० सेकंदांवर आणण्यात आली आहे.
या बदलाचा थेट फायदा रिमिटर बँक, बॅनिफिशियरी बँक, आणि मुख्य म्हणजे वापरकर्त्यांना होणार आहे. कारण, व्यवहार फसल्यास आधी ३० सेकंद थांबून स्टेटस बघावं लागे, आता ती प्रतीक्षा केवळ १० सेकंदांची असणार आहे. अनेकदा व्यवहाराच्या वेळेस पैसे अडकणं, स्टेटस न मिळणं, किंवा पुन्हा व्यवहार करावा लागणं यामुळे गोंधळ होतो. पण आता या बदलामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान होणार आहे.
NPCI ने बँकांना आणि पेमेंट अॅप्सना निर्देश दिले आहेत की, त्यांच्या प्रणाली या नव्या वेळेनुसार तत्काळ अपडेट कराव्यात. वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी या सुधारणा अत्यावश्यक असल्याचं NPCI चं स्पष्ट मत आहे. जर काही बँका किंवा त्यांचे पार्टनर मर्चंट या सुधारणा करत नसतील, तर त्याचा परिणाम थेट युझर एक्स्पीरियन्सवर होईल, असंही सर्क्युलरमध्ये नमूद आहे.
या सर्क्युलरमधील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येत्या ऑगस्टपासून आणखी काही मोठे बदल लागू होणार आहेत. बॅलन्स इन्क्वायरी, खाते यादी आणि ऑटोपे मँडेट यांसारख्या सेवा कशा वापरल्या जातात, यावर देखरेख ठेवण्याचे आदेश PSP बँकांना देण्यात आले आहेत. यामुळे UPI व्यवहारांमध्ये अजून शिस्त येणार असून, चुकीचा वापर टाळता येणार आहे.
गावाकडील लोक देखील आजकाल मोबाइलद्वारे व्यवहार करतात. कोणाचं वीजबिल भरायचं असो किंवा बँकेत पैसे पाठवायचे असोत, मोबाईल अॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. अशा वेळी व्यवहार अडकणं किंवा पैसे अडकल्याची भीती असणं, हे टाळण्यासाठी NPCI चा हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह ठरणार आहे. आता लोकांना केवळ १० सेकंदात व्यवहाराचं स्टेटस मिळणार आहे, आणि रिव्हर्सल प्रक्रियाही झपाट्याने होणार आहे.
या बदलामुळे लोकांचा विश्वास डिजिटल व्यवहारांवर आणखी दृढ होईल, असं सांगायला हरकत नाही. बँकांकडून या नव्या प्रणाली तत्काळ राबवाव्यात, असंही निर्देश देण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या बदलाचा अनुभव वापरकर्त्यांना त्यांच्या अॅपमध्ये दिसायला लागेल.
(Disclaimer: ही दिलेली माहिती हिंदुस्तान वृत्तपत्रानुसार आहे, याबाबत मी कुठलाही दवा करत नाही.)