Maharashtra Weather | राज्यात मान्सूनने (Monsoon Update) पुन्हा एकदा जोर धरला असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांत पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट (Red Alert) तर पुणे, सातारा, कोल्हापूरसह घाटमाथ्यावरील भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईतही रात्रीपासून पावसाची संततधार सुरु असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.Maharashtra Weather
मुंबईत संततधार, पण वाहतूक सुरळीत
मुंबई आणि पुणे शहरात रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतील तिन्ही मार्गावरील लोकल सेवा सुरळीत सुरु असून रस्त्यांवर पाणी साचल्याचे प्रकार अद्याप आढळलेले नाहीत. पुण्यातही अनेक भागांत मुसळधार पावसामुळे वातावरण गारठले आहे. वरंधा घाट, शिरगाव परिसरात 113 मिमी पावसाची नोंद झाली असून मुठा घाटात देखील जोरदार पाऊस कोसळत आहे.
कोणत्या जिल्ह्यांना काय अलर्ट?
🔴 रेड अलर्ट – रायगड
🟠 ऑरेंज अलर्ट – रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा
🟡 यलो अलर्ट – मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक घाटमाथा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
याशिवाय बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सूनची वाटचाल आणि हवामान स्थिती
सध्या दक्षिण मध्य महाराष्ट्रावर समुद्र सपाटीपासून ७.६ किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. बंगालच्या उपसागरातही चक्राकार वारे सक्रीय असून त्यामुळे संपूर्ण राज्यात मान्सून अधिक सक्रीय होण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत विदर्भ, गुजरात, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये मान्सूनची गती अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे.
मुंबईसाठी विशेष इशारा
भारतीय हवामान खात्याने मुंबई महानगर क्षेत्रासाठी पुढील ३ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी गरजेव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1916 मदत क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सावध रहा, सुरक्षित रहा
राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर वाढत असल्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, नद्यांच्या काठावर जाणे टाळावे आणि वीज पडत असताना उंच झाडांखाली किंवा धातूच्या वस्तूंजवळ थांबू नये, असे आवाहन हवामान विभाग व स्थानिक यंत्रणांकडून करण्यात येत आहे.